बारामती : ‘पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची या शैक्षणिक युगात निकड भासत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देणे हे आजच्या शिक्षकाचे कर्तव्य आहे. हा बदल करण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात बदलत असलेले प्रवाह जाणून घेणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे विभागाचे उच्च शिक्षण सह संचालक डॉ. विजय नारखेडे यांनी व्यक्त केले.
अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती आणि एचआरडीसी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालायात प्रथमच ‘स्पेशल विंटर स्कूल’च्या कोर्सचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ९ ते २९ सप्टेंबर या कालावधीत हा कोर्स सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी भूषविले.
डॉ. नारखेडे पुढे म्हणाले, ‘नव्या युगात आयसीटी (ICT) चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच जाणीवेतून विद्यार्थ्यांना शिकवताना अध्यापन पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहे. अधिकाधिक ‘आयसीटी’चा वापर करून विद्यार्थ्यांना घडवणे काळाची गरज आहे. या कोर्सचा अधिकतर लाभ शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्राध्यापकांनी पोहचवला पाहिजे.’ टी. सी. महाविद्यालयाने हा बदलता काळ योग्यवेळी ओळखून वेगवेगळे कौशल्यपूर्ण कोर्सेसची सुरुवात महाविद्यालयात केल्याबद्दल त्यांनी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. मुरुमकर यांनी या विंटर स्कूलच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले की, ‘आजच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात सर्वच अत्यंत जलदगतीने बदलत आहे. आपण सर्व वैज्ञानिक आणि तांत्रिकदृष्ट्या एका संक्रमण काळातून जात आहोत. समाजाप्रमाणेच आपला मुख्य लक्ष्यगट म्हणजे विद्यार्थी हा सुद्धा तांत्रिकदृष्ट्या बदलत आहे किंबहुना आजची पिढी अधिकच तंत्रकुशल झालेली आहे. हा बदल त्यांच्यानुसार आपणही अंगीकारणे गरजेचे झाले आहे. या नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच युगातील संसाधनांचा वापर करून आधुनिक अध्यापन पद्धतीने शिक्षण दिले पाहिजे.’ हा रिफ्रेशर आणि ओरीइंटेशन कोर्स निश्चितच सहभागी प्राध्यापकांना यासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
तत्पूर्वी या विंटर स्कूलचे समन्वयक डॉ. मिलिंद गजभिये यांनी या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. या कोर्ससाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून देखील एकूण ८५ प्राध्यापकांनी प्रवेश अर्ज सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शिवाजी साठे, डॉ. अविनाश जगताप, डॉ. अजित तेलवे, डॉ. सचिन गाडेकर उपस्थित होते. डॉ. योगिनी मुळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजय ढवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.